Tuesday, August 21, 2018

चंद्रशेखर सानेकर आणि संयतशील लिखाण

एखादी रचना वृत्तात लिहिली...काफ़िये,रदीफ़,अलामत वगैरेंचे नियम पाळले..म्हणून आपली रचना गजल/वृत्तबद्ध कविता बनणार नाही........

त्यासाठी लागते आपली पारदर्शकता... बहुतेकांचा गैरसमज आहे की वृत्त पाळणे म्हणजे "लगावली" पाळणे असते... वृत्तबद्ध लिखाण का करावे यामागचे कारण जाणणे खूप आवश्यक आहे. केवळ फ़ेसबुकात सर्व लोक वृत्तबद्ध कविता/गजल लिहित आहेत म्हणून किंवा प्रचंड वाहवा/तारीफ़ पदरात मिळते म्हणून वृत्तबद्ध लिखाण करण्याचा प्रयत्न केला तर आयुष्यभर ते आपल्याला शक्य होणार नाही. आपल्या प्रकृतीला हात घालून जेव्हा आपण सर्वमान्य व्याकरणाच्या आधाराने काही मांडू तेव्हा खरी वृत्तबद्ध रचना बाहेर आणि निखळ आनंदाची अनुभूती आपल्याला मिळणार आहे. प्रकृती ही काय भानगड आहे, हे आपल्या अवतीभवती असलेल्या गजलकारांच्या लिखाणाचा नीट अभ्यास केला तर हळूहळू आपल्याला कळू लागेल.

प्रकृती म्हणजे केवळ शारिरीक नव्हे किंवा आपली वागणूक नव्हे,प्रकृती म्हणजे केवळ चांगलेपणा नव्हे किंवा प्रकृती म्हणजे  केवळ उच्चविचार/गाढा अभ्यास/सखोल लेखन नव्हे.... सर्वसाधारणत: प्रकृती म्हणजे मनाचा विशिष्ट कल आहे. ज्यामधून व्यक्ती सभोवतालच्या व्यक्तींचे परिस्थितीचे विश्लेषण करीत असते व त्याआधारे त्या व्यक्तीबद्दल अथवा परिस्थितीबद्दल चांगले किंवा वाईट ग्रह बनत असतात व त्यावर आधारित निर्णय आपण घेत असतो. एखाद्या व्यक्तीबद्दलची अथवा परिस्थितीबद्दलची आपल्या स्मृतीतील सारांश व त्याबद्दलचे आपण करत असलेले ग्रह यांच्यातील दुवा म्हणजे देखील प्रकृती होय.

सोप्या भाषेत सांगायचे तर पॉजिटिव्ह अथवा निगेटिव्ह भावना निर्माण करण्याची ताकद/कला व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून असते. बाकी सर्व सोडून देऊ आणि हे बघू की आपली प्रकृती आणि त्यानुसार आपल्या मनाने घेतलेला निर्णय हा आरसा असतो आपल्या निरिक्षणाचा. यावरून प्रकृती म्हणजे एक प्रकारे विविध गोष्टींचे/ व्यक्तींचे केलेले मूल्यमापन असते, असे आपण म्हणू शकतो. एखादा सामाजिक/सांस्कृतिक मुद्दा, वस्तू अथवा व्यक्ती हे आवडणे अथवा न आवडणे हे काही प्रमाणात व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून असते. आपली मुळ आवडनिवड,मुळ स्वभाव,मुळ कल यांच्या आधाराने आपण जेव्हा लिखाण करुन लागतो तेव्हा आपल्याला अमाप/अमर्याद/अतुलनीय आनंद मिळतो. खरं तर याच आनंदासाठी आपण लिखाण करायला हवंय. . इतर कुणाला मिळो अथवा ना मिळो पण स्वतःला मात्र हा अनुभव यायलाच हवा आणि हेच लिखाण जेव्हा वाचकाच्या मुळ प्रकृतीला,मुळ स्वभावाला हात घालते/स्पर्श करते तेव्हा तोच आनंद वाचकाच्या मनातही ट्रान्सफ़र होतो. आणि त्यामुळेच लेखक आणि वाचक यांच्यात एक गूढ अशी बांधिलकी निर्माण होते. आता हेच बघा की ...गायक गातो,चित्रकार चित्र काढतो,वादक वाजवतो तसेच लेखक लिहितो.....यातून दर्शकांचे/प्रेक्षकांचे/श्रोत्यांचे मनोरंजन होते हा भाग दूरचा...त्या सर्वांना अगोदर आपल्या कलेतुन आनंद मिळतो आणि नंतर हा आनंद आपोआप त्यांच्या कलाकृतीतून इतरांमधे पसरला जातो.

वर हे रामायण लिहिण्यामागचे प्रयोजन काय !!(?) ते सांगतो आता....प्रकृती अभ्यासण्यासाठी (मी वाचलेले) काही कवी/गजलकार आपण अभ्यासू.... हे सर्वजण आपल्या विशिष्ट प्रकृतीमुळे लोकप्रिय आहेत... आणि नीट बघाल तर जाणवेल की या प्रत्येकाची वृत्त निवडण्याची एक वेगळीच खासियत आहे....वरवर पाहिले तर सगळेचजण सगळीच वृत्ते हाताळतात,मान्य आहे...तरीसुद्धा माणूस आपल्या विचारांच्या प्रवाहाप्रमाणे वृत्ते निवडतो हेही लक्षात येते...चंद्रशेखर सानेकर हे एक आदरणीय नाव.... प्रचंड अभ्यास, प्रचंड वाचन ,आयुष्याचा/माणसांचा/परिस्थितींचा अनुभव आणि सोबतच स्विकारलेली जबाबदारी.....जबाबदारी फ़ार महत्वाचा शब्द आहे इथे...कविता ही जबाबदारी आहे....जशी लेकीची जबाबदारी आईवर असते तशीच !!! सानेकर सर अत्यंत जबाबदारीने एकेक शेर लिहितात....त्या प्रत्येक शेरातून त्यांची जबाबदार/ठाम आणि चौकस प्रकृती दिसते...मित्रांनो हा लेख मी कवी/गजलकारांच्या कौतुकासाठी लिहित नाहीये....मला दाखवायचेय की आपली प्रकृती आपल्या लिखाणावर कसे संस्कार करते.... सानेकर सरांचा हा शेर बघा !! केवढा ठामपणा आहे त्यांच्यात...

>>सवाल माझा हा नाही की हिरे विकू की खडे विकू
सवाल माझा हा आहे की पारख आहे कोणाला ?
~सानेकर

ठामपणा म्हणजे सिद्धांत असतात आणि असले सिद्धांत केवळ हजारो प्रयोगानंतरचे फलित असते... संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम आणि इतर संतमंडळींनी आजन्म केलेल्या मनस्वी हरिनामातून तयार होणार्‍या उर्जेला तसेच चिंतनाला शब्दात मांडले म्हणूनच त्यांचे लिखाण प्रत्येक मनावर प्रभाव पाडू शकतेय.... व्यक्ति म्हणून लिखाण न बघता व्यक्तिचे आचार विचार बघून लिखाण वाचले की आपोआप गोडी निर्माण होते.. चंद्रशेखर सानेकर ही व्यक्ति जितकी खोडकर,लहरी,मनमिळाऊ,प्रेमळ आहे तितकीच साधक सुद्धा आहे...असा साधक जो तपश्चर्येच्या मार्गाने आपल्या आतल्या प्रश्नांची उत्तरे शोधतो आणि ही प्रश्नोत्तरे कवितेच्या/गजलेच्या रुपात वाचकांसमोर मांडतो... ते लिहितात...

>>तोवरी आपापल्या तंद्रीत भटकू सारखे
भेटलो तर भेटूया की धूमकेतूसारखे...

माणसाची भूक पाहुन देव थकुनी बोलला
" खायला इतके तुला कोठून आणू सारखे "

हे अता माझ्या उरावर फूल फुलले कोणते ?
ते तुझ्या हातात होते काय चाकूसारखे ?

वरचे तीनही शेर अगदी वेगवेगळे आहेत पण त्यांचा मुळ गाभा निश्चयात्म्क आहे.....तो सहज बनलेला नाहीये....जमीन खयाल वगैरे वगैरे मला कळत नाही...मला दिसतो त्या व्यक्तिचा दृष्टिकोन..त्याची प्रकृती...!!

जिकडे तिकडे कोसळताना बघतो माझी धडपड मी
पानगळीच्या दिवसांबद्दल करू कशाला ओरड मी !

तुझ्या सहज रेषेतच माझे सोपेपण दडले आहे
तुला जेवढा दिसतो आहे तितका नाही अवघड मी

हे शेर म्हणजे प्रमाण आहेत त्यांच्या चिंतनाचे असे मला वाटते !! वाचतानाच कळेल की मुळ तत्वज्ञानाला त्यांनी त्यांच्या प्रकृतीवर घासून बाहेर आणलेय....  फांदीवर आलेले पान हे एक न एक दिवस गळुन पडणार आहे ही खंत वैश्विक असताना मी पानगळीच्या दिवसांबद्दल का ओरड करावी?? एवढीशी गोष्ट शेरात मांडली तर त्यात काय विशेष??? असे ज्याला वाटेल त्याला गजल/प्रकृती कळलीच नाही असे म्हणावे लागेल.... आदरणीय सुरेश भटांनी सांगितले होते की मराठी कवितेत/गजलेत समाजपरिवर्तनाची ताकद असायला हवी...मराठी कवितेने/गजलेने प्रबोधन, प्रशिक्षण दिले तरच ती मनामनात उतरेल....म्हणूनच माझ्या नजरेतील काही कवी/गजलकारांच्या रचना वाचताना मी शोधतो की याने ही रचना कोणत्या मानसिक अवस्थेत आणि कोणते ध्येय समोर ठेवून लिहिली असेल.... बघा हे शेर....
---------------------------------

" कुठल्या मातीची आहे रे गझल तुझी ! "
" समजत नाही कशी घ्यायची दखल तुझी ! "

काय तिची ताकद आहे ती समजुन घे !
पृथ्वी ओढत घेउन जाइल गझल तुझी !

~चंद्रशेखर सानेकर

मी जे काही इथे लिहितोय हे माझ्या नजरेतून लिहितोय...मला कळलेले कवी/गजलकार याच दृष्टिकोनातून लिहितोय त्यामुळे हे प्रमाण वगैरे आहे असे मी म्हणत नाही.... पण प्रत्येक अभ्यासू/जिज्ञासू व्यक्तिची प्रकृती त्याच्या लिखाणातून डोकावते हे मात्र ठाम मत आहे... कविता/गजल यांचे व्याकरणातील नियम समजले तरी नुकताच काव्यक्षेत्रात प्रवेश करणार्‍यांनी आपल्या प्रकृती तपासायला हव्यात.... आणि वृत्तांचा/वृत्तींचा/प्रकृतींचा/कवितांचा/गजलांचा खरोखर अभ्यास करायचा असेल तर कमलाकर देसले आबा , खलिल मोमीन सर ,Bhushan Katakkar , Sadanand Gopal Bendre अप्पा, Shubhanan Chinchkar, Tushar Seema, सतिश दराडे, रणजित पराडकर , देवेंद्र गाडेकर, Sanjay Chaudhari, गोविंद नाईक ,क्रांती सडेकर,ममता सिंधुताई,  अमेय पंडीत, सुधीर मुळीक( नावे उदाहरणासाठी दिलीत केवळ) यासारख्या चिंतनशील लोकांच्या रचनांचा अभ्यास करणे गरजेचे आहे....या विषयावर हा माझा पहिलाच लेख आहे....प्रत्येक लेखात वेगळ्या प्रकृतीचा एक वेगळा कवी/गजलकार वाचकांसमोर मांडावा अशी माझी इच्छा आहे....या लिखाणात काही तृटी अथवा आक्षेपार्ह विधान आढळल्यास माझा नवशिकेपणा समजून मोठ्या मनाने माफ़ कराल ही अपेक्षा...

-- संतोष वाटपाडे ( नाशिक )

No comments:

Post a Comment