Tuesday, August 21, 2018

मुक्तछंद


कमालीचे ढेपाळलेपण एकंदर मराठी कवितेत दिसून येतेय. हेकेखोरपणा आणि स्पर्धा या दोन ज्वालामुखींच्या तोंडातून दिवसेगणिक वाहत चाललेला कविता नावाचा लाव्हारस एक दिवस नक्कीच खडकासारखा कडक ,निर्जीव होईल आणि मातीत धसून जाईल हे निश्चित... एक चमू असा आहे जो म्हणतोय की कविता जशी सुचली लिहू... तिच्यावर संस्कार करणार नाही. दुसरा चमू म्हणतो आधी संस्कार शिकून घ्या मग येणारी कविता आपोआप तो रंग घेऊन येईल. तिसरा चमू म्हणतो या दोन्ही चमूंना लिखाणाचे ज्ञान नाही. एखादा सरळ सरळ सुरेश भटांच्या अनमोल लिखाणावर टिका करुन जातो. कुणी म्हणतो ग्रेसांच्या कविता म्हणजे दुर्बोध असतात, मंगेश पाडगावकर फार सामान्य लिखाण करायचे आणि एखादा म्हणतो ढसाळांची कविता वाचावीशी वाटत नाही. हा प्रकार आहे तरी नेमका काय?? आपण आपल्या बाळबोध बुद्धीनुसार इतर लोकांचे मुल्यमापन करणार आहोत का? मूल्यमापन करण्याची आपली फूटपट्टी callibration केलेली आहे का? इतर कुणाच्या साहित्यावर बोट ठेवण्यापुर्वी आपल्या स्वतःच्या लिखाणाचे,ज्ञानाचे किवा वाचनाचे मुल्यमापन आपण करुन घ्यायला नको का?

बोटावर मोजणारे समिक्षक उरलेत आता आपल्या हातात. त्यांनाही मनसोक्त लिहिण्याची मुभा कदाचित राहिली नसावी. साहित्याचे मुल्यमापन करताना त्याचे रसग्रहण करता आले पाहिजे. कविता वाचली /आवडली मान्य पण नेमके काय आवडले आणि कविता वाचली /नाही आवडली तर नेमके काय नाही आवडले या दोन्ही गोष्टींचे सकारण उत्तर रसग्रहणासोबत देऊ शकतोय का आपण?? काम असते,जबाबदार्‍या असतात , वेळ मिळत नाही म्हणून साहित्यावर सकस अभिप्राय लिहिणे जमणार नाही असे आपण मोठ्या दिमाखात सांगतो आणि याउलट याच घाईत याच धावपळीत एखादी रचना वाचून पटकन तिच्यावर ताशेरे ओढून जातो आपण. उत्तम साहित्याला सविस्तर उत्तम म्हणायला आपल्याला कमीपणा वाटतो आणि उत्तम(?) नसलेल्या साहित्याला अगदी तज्ञ असल्यासारखे कसे उत्तम नाही हे पटवून देतो.

आपल्या अंतर्मनातील विचारांच्या समुद्रात चांगल्या वाईट विचारांच्या लाटा नेहमी उसळत असतात. या लाटांचा वेग काही काळ तरी सारखा असतो.  ही घटना सतत तीव्रतेने घडत असल्याने आपण हीला विचारांची वारंवारीता म्हणू या. ही वारंवारीता एखाद्या कल्पनेबद्द्ल,स्वप्नाबद्दल,घटनेबद्द्ल जेव्हा एका नियमित गतीने व्यक्त होऊ लागते तेव्हा गद्याचे तुकडे पडू लागतात. जे व्याकरणाच्या नियमात सारख्या शब्दांचे अथवा मात्रांचे नसले तरीही उच्चारताना आपल्या आंतरिक उर्जेचे आवर्तन आणि लय घेऊन येतात.

मुक्तछंदाच्या बाबतीत बोलायचे झाले तर आता लिहिणार्‍यांना नवीन पेव फुटलेत  आणि ते म्हणतात आमची कविता छंदमुक्त आहे. मुक्तछंदाला विशिष्ट लय असते जे त्यांच्या कानावर येत असल्याने आणि स्वतःच्या लिखाणावर भरोसा नसल्याने त्यांनी आपल्या कवितेला छंदमुक्त म्हणावे का? आपले विचार आपले श्वास आपला आनंद आपले रडणे बोलणे या प्रत्येकाला नाद आहे लय आहे... म्हणून छंदही आहे. आपण जी मुक्तछंदातली कविता लिहित आहोत तो गद्याचा तुकडा कसा नाही हे जर स्पष्टपणे सांगू शकलो तर आपण मुक्तछंद लिहिण्यास पात्र आहोत. हेकेखोरपणाला इलाज नाही....कुणी म्हटला की गद्याचा तुकडा वाटत असला तरी मला कविता म्हणून सुचला आहे....अशा ठिकाणी आपण डोळे ,कान बंद करुन मार्ग बदलणे योग्य ठरेल.. मुक्तछंद आणि छंदमुक्त रचना यातील फरक जाणायचा असेल तर इंदिरा संतांच्या कविता अभ्यासायला हव्यात.  मुक्तछंदाला एक वेगळी उंची देताना अनेक दिग्गजांनी छंदबद्ध कवितेलाही त्याच ताकदीने पुढे नेले.

मुक्तिबोध बंधूच्या मुक्तछंदाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादापासून मुक्तछंदात कविता लिहिल्या जाऊ लागल्या असे वाचनात आले होते. छंदबद्ध कवितांच्या प्रस्थापित राज्यात क्रांती हवी आणि काळजाचा हुंकार जसाच्या तसा शब्दबद्ध करता यावा यासाठी मुक्तिबोधांनी क्रांतीच्या कविता लिहिल्या. त्यांच्या कवितांमधून समकालीन आशयासोबत स्वप्नरंजनदेखील होते तरीही त्यांनी मुक्तछंदाला दर्जा दिला . (त्यात त्या काळातील छंदबद्ध कवींवर टिकाही केली हा भाग वेगळा.).

खरे तर मुक्तछंद कसा लिहावा पेक्षा मुक्तछंद कसा जगावा हे शिकून घ्यायला हवे. मुक्तछंद ज्याला जगता आला त्याला तो लिहिणेही सहज शक्य आहे. उत्तम मुक्तछंद म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने देत असतो. मी आजवर सर्व लिखाण वृत्तबद्ध करत आलो असलो तरीही काही नावे अशी आहेत की ज्यांच्या मुक्तछंदातल्या कविता वाचून त्या लिखाणाचा अत्यंत जास्त हेवा वाटतो. त्यांच्यासारखी एखादीतरी कविता आपल्याला लिहिता यावी असे वाटून जाते. खलील मोमीन सर जेव्हा भेटतात तेव्हा धामणस्करांच्या कविता ऐकवतात. या कविता ऐकताना होणारी मनाची अवस्था शब्दात मांडणे अशक्य आहे. विशेष सांगावे वाटते कि खलील मोमीन सरांसारखा सिद्धहस्त आणि वृत्तबद्ध काव्यात अजरामर लेखन करून ठेवलेला माणुस स्वतःच्या रचना न ऐकवता इतर कवींच्या कविता पाठ ठेवतो आणि ऐकवतो. दुसरी एक अशीच व्यक्ति आहे आमच्या नाशकात जे स्वतः सिद्धहस्त कवी आहेत तरीही कुठे कुणाला कविता ऐकवायच्याच तर ते नारायण सुर्वेंच्या कविता ऐकवतात. ते आदरणीय आहे कविवर्य संजय चौधरी . चौधरी सरांनी मुक्तछंदाला इतकी प्रियता मिळवून दिली की आज प्रत्येकजण त्यांच्यासारखा मुक्तछंद लिहू बघतोय. सोबतच त्यांनी छंदबद्ध कवितेचाही हात सोडला। नाही हे विशेष !!! आपला लाडका मित्र तनवीर सिद्दिकी गुलजारांच्या कविता ऐकवतो. याचे कारण त्या दिग्गजांचा या कवींवर प्रभाव नसून त्या आवडीच्या (एक किंवा अनेक किंवा सर्वच )कविता त्यांनी जगल्याची साक्ष आहे . तनवीर सुद्धा मुक्तछंदावर जेवढे प्रेम करतो तेवढेच वृत्तबद्ध साहित्यावर करतो हे नमूद करावे वाटते.  मुक्तछंद जसाच्या तसा पाठ ठेवणे म्हणजे काही गंमत नाहीये. (माझ्यासाठी तर ते अजिबात अजिबात शक्य नाहीय.) जो मुक्तछंद आपल्याकडून कळत नकळ्त जगला गेलाय तोच बहुधा आपल्याकडून आपोआप वदला जात असावा असे माझे मत मी बनवून घेतले आहे. तनवीर सिद्दिकीची कविता वाचताना त्यात अनुभवाच्या ऐरणीवर लालबुंद करुन ठोकलेली सामाजिक मानसिकता सिद्धांताच्या रुपात आपल्याला वाचायला मिळते. बघा ही कविता...

>>एक बी जिला हात लावला
ती म्हणाली मला वेल व्हायचंय
आधार दिल्यावर जेव्हा ती वेल झाली
तेव्हा म्हणाली मला झाड व्हायचंय
तिला कणा दिल्यावर ते झाड म्हणालं
मला तुम्हाला सावली द्यायचीय

त्या सावलीत बसून ज्या कविता लिहिल्या
त्या आता त्या झाडांना आवडत नाहीत..
मात्र पायापाशी एक अनाथ बी
ऐकत हसत असते

मला आता हात लावायची भीती वाटते
..कागदाला !

किंवा ही एक बघा...

>>एकेदिवशी स्वप्नात
समोर देव होता आणि त्याच्यासमोर मी

माझ्या हातात माझ्या जीवनाची वही होती
त्यात बेरीज होती, वजाबाकी होती
त्यात भागाकार होते, गुणाकार होते ..

देवाच्या हातात एक मूल होते
तो तिला विचारुन विचारुन पाणी पाजत होता

माझ्याकड़े हे नाही, ते नाही
मी रागात त्याच्याशी
बोलायला सुरवात करणार होतोच
की
तो हसत बोलला...
हिला ओळखतो ?

ही तुझी मोठी बहीण आहे वेड्या...
हिच्याकड़े 'जन्म' च नाही !

अलेले, गुड्डू, बघ तुझा भाऊ आलाय..
हा, तर तू काय बोलत होतास?

ऐनी प्रॉब्लम?

मुक्तछंदाला विशिष्ट लय असावी म्हणतात ....कोणती लय.. कशी लय...यावर मी या निष्कर्षावर आलोय की ही लय म्हणजेच आपल्या विचाराधीन मनाच्या आवर्तनांतून उत्पन्न होणारी कंपने. आता ही कंपने ओळखायची तरी कशी नेमकी? बहुतेक वेळा मुक्तछंदाच्या नावाखाली गद्य उतारे वाचून दाखवणारे लोक भेटतात आणि मग मुक्तछंदावर प्रश्नचिन्हे उभी राहू लागतात. मुक्तछंद जेव्हा मनाचे आवर्तन घेऊन बाहेर येतो तेव्हा कवितेच्या प्रत्येक ओळीत एक नादमय हुंकार जाणवतो. अशी कविता वाचताना अथवा ऐकतानासुद्धा फार प्रभावी वाटते.. कमालीची निरागसता आणि आशावाद दाखवणारी ही रचना बघा....रचना वाचताना मनात येते की कोणत्या मानसिक अवस्थेत संजय चौधरी सरांनी ही कविता सुचली असेल....असे कोणते चिंतन असेल ज्याने कवितेला एवढी प्रखरता आली असेल !!

>>मथुरेला गेलो
म्हटलं कृष्ण कुठं आहे ?
बोलवा जरा , सांगा भेटायला आलोय
तर उरलेले लोक म्हणाले
कृष्ण आता इथे रहात नाही
आता इथे बासरीचे सूर घुमत नाही

कृष्ण गेला
सोबत गोपी गेल्या
बासरी गेली गायी गेल्या
सोबत मथुराही गेली
आता यमुनेचं ते पाणी ही नाही
सगळं वाहून गेलंय

पण असं म्हणतात
जो भेटण्याची तहान घेऊन येतो
त्याला कान्हा भेटल्याशिवाय रहात नाही

घरी आलो
आरशात पाहिलं तर
चेहर्‍याच्या जागी मोरपीस......!!

कविता संपते तिथे आपण गोळा करुन ठेवलेल्या सर्व श्वासांना मोकळीक मिळते आणि आपोआप ओठावर(कुणाच्याही) स्मित तरळून जाते. हे स्मित म्हणजे प्रत्येकवेळी कवितेला मिळालेला पुरस्कारच नव्हे का !! खलील मोमीन सरांच्या तोंडपाठ झालेल्या शेकडो कविता धामणस्करांच्या आहेत. ज्या धामणस्करांनी लिखाणाला एक वेगळी उंची दिली. वास्तवाला समाजासमोर ठेवताना त्याला हळवेपणाचा साज चढवला आणि विश्वासाच्या कसोटीवर उतरलेले प्रेमसुद्धा व्यक्त केले... खाली तीन कवितांचे दाखले आहेत जे वाचल्या वाचल्या तुम्हाला धामणस्करांचे संग्रह वाचण्याचा मोह होईल.

तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र जंतूच्या हळव्या पायांना
यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून
बरेच काही उगवून आलेले….(....)
**
रात्री सुचलेली गाणी झाडांना
सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून
पाखरांनी एकच धरलंय :
झाडांना जाग येण्यापूर्वीच
आकाशवाटांनी निघून जायचं आणि
दिवस मिटल्यानंतरही झाडांत
लवकर परतायचं नाही …(....)
**
प्रेम करणं ही माझी
उपजत पवित्र प्रेरणा आहे.
मी करतो प्रेम झाडांवर, पक्ष्यांवर, आकाशावर,
उन्हावर, चांदण्यावर आणि
माणसांवरदेखिल. मला
ऐकायची नाहीत म्हणूनच तुमच्या
भयभीत मनाची प्रेम न करण्याची कारणे. (.....)
***
या आणि अशा अनेक रचना मुक्तछंदाच्या मांदियाळीत दिमाखाने उभ्या आहेत. आपल्यालाही आपली कविता या रांगेत उभी करायची असेल तर मुक्तछंदावर अन्याय न करता/ त्याला व्यक्त होण्यासाठी पुरेसा वेळ देऊन / त्याला टाळ्या मिळवण्याचे साधन न मानता रांगत रांगत का होईना बाळसेदार होईपर्यंत सांभाळायला हवे...नारायण सुर्वेंची 'तुमचच नाव लिवा' किंवा कुसुमाग्रजांची " पाठीवरची थाप " म्हणा किंवा इंदिरा संतांची " सहज सहज टाकुन गेलास" असो प्रत्येक रचनेत त्यांनी आपल्या अंतर्मनाची निखळ आवर्तने भरली आहेत. आपणही आपल्या आत गुदमरणार्‍या मुक्तछंदाला हात देऊन मुक्ती देताना त्याच्या मुलभूत छंदाला जपण्याचा प्रयत्न करु या.....एक वाचकाच्या भुमिकेतून हा लेख लिहिलाय... भावनेच्या भरात काही चुकले असल्यास माफ कराल ही अपेक्षा (क्रमश:)

-- संतोष वाटपाडे

गोविंद नाईक आणि गजल

आभाळाच्या दिशेन बोट करुन ठणकावून गजलेचा शेर ऐकवणारा आपला गजलकार मित्र आहे जो उत्तम चित्रकारही आहे. नाव सांगायची गरज नाहीये....कारण तुम्ही त्याला ओळखले असेलच..

नुकतीच जन्मलेली आहेत पाखरे ती
इतक्यात काय सांगू..आकाश काय असते..?

यातून त्याने नवोदितांना काही इशारा दिलाय  जणू !! परिपक्वता पुस्तकातून, वाचनातून अथवा श्रवणातून येत नसते....प्रत्येक लोखंडाला अनुभवाच्या भट्टीतून जाणे गरजेचे असते. त्यासाठी हवा फक्त संयम आणि संयम आहे म्हणूनच शेरात परिपुर्ण आशावाद जाणवतो.

एवढी का गढुळ झाली आसवें ही ?
टाकला कोणी खडा स्वप्नात माझ्या ?
****
विश्वासाने बोट कुणाला द्यावे धरण्यासाठी
जो तो इकडे टपून आहे हात छाटण्यासाठी..
****
छापले जातील सोयीस्कर उद्या काही रकाने
चालली आहे गुन्ह्याची चौकशी संगनमताने..

वरील सर्व शेरांमधे त्याच्या स्वभावाचे पैलू स्पष्ट होत आहेत. आपल्या आत जो त्रयस्थ बसलेला असतो त्याच्या नजरेतून बघणेही जमायला हवे. तरच गजलेच्या प्रत्येक शेरात आपण असामान्य आशय भरु शकतो.

एक जाणकार कवी, उत्तम गजलकार , बुद्धिमान चित्रकार आणि फ़णसासारखा गोड स्वभाव असलेला हा कणखर गजलकार त्याच्या प्रत्येक शेरातून त्याचा वेगळेपणा सिद्ध करत असतो. कविता/गजल चांगली अथवा वाईट कधीही नसते. एकतर ती असते किंवा नसते. आपल्या आतल्या विचारांचे आवर्तन अगदी जसेच्या तसे वाचकाच्या काळजात उतरवण्याचे कसब ज्याला जमले तोच खरा जातिवंत साहित्यिक म्हणावा...बाकी लेखण तर भरमसाठ होताना दिसतेय आपल्याला.

खरं तर मनातून आवेगात आलेला भावनांचा पूर कुठल्या फुटपट्टीने मोजायचा नसतो. आपल्या आतील कलेतून मुक्तपणे व्यक्त होणे हाच कवीचा मुळ स्वभाव असावा. कविता निर्मिती ही फार वेगळी प्रक्रिया आहे. आपल्या वेदना-संवेदना आणि चिंतन यांच्या मंथनातून बाहेर येणार सुंदर रत्न म्हणजे कविता. जशा प्रकारचे मंथन असणार तशाप्रकारची निर्मिती असणार आहे. मंथनातून अमृतही बाहेर पडेल ,विषही येईल तशा अनेक दिव्य गोष्टीही हातात येणार आहेत. हे मंथन करताना मात्र आपल्या अंतर्मनात परिणामांची जाणीव आधीपासून ठेवायला हवीय.

कविता/गजल कशी तयार होते, कशी लिहावी याचे काही नियम नाहीत. असूही शकत नाहीत. त्यामुळेच त्यांची व्याख्या करणंही अगदी कठीण आहे. आपल्या पुर्वजांनी साहित्यात जे काही लिहून ठेवलेय त्याच्या आधारे आपण काही विशिष्ट निष्कर्ष अथवा ठोकताळे बनवून घेतले आहेत. हे लिखाण आपल्याला अनेक प्रकारे मार्गदर्शनही करते मात्र त्याच लिखाणाला प्रमाण मानुन आपली दिशा ठरवणे हेही चांगले नाही. पुर्वजांनी आपल्यासाठी शिडी बनवून दिलीय जेणेकरुन उंच शिखरावर आपल्याला पोहोचता येईल. पण सतत त्या शिडीचा वापर करणे किंवा इतरांनाही तेच सांगणे म्हणजे अतिरेक ठरेल. अशा कृतीने आपली मुळ सृजनशक्ती चेंगरली जाऊ शकते.

लेखन आधी जन्माला आलेय आणि त्यानंतर त्याचा अभ्यास करुन त्याच्यावर आधारीत शास्त्रे निर्माण केली गेलीत. कोणताही कवी/गजलकार  केवळ त्यांच्या तंत्रामुळे/वृत्तांमुळे/व्याकरणामुळे मोठा होत नसतो(मोठा मानायचा नसतो). ही तंत्रे अजरामर करणारे तुम्ही आपण असतो. अभंग छंदाला तुकारामांनी,अष्टाक्षरी छंदाला बहिणीबाईंनी अथवा दोहा छंदाला कबीरांनी अजरामर केलेय. आपली प्रतिभाच हे सर्वकाही करु शकते. म्हणून कागद पेन घेऊन कविता लिहायला बसताना हजार वेळा विचार करायला हवी की आपण काय लिहिणार आहोत? का लिहिणार आहोत? लिहायलाच हवे का? आणि लिहिलेच तर हे खरोखर असामान्य आहे का?

कोणतेही वृत्तबद्ध लेखण आपल्या वृत्तीतूनच परावर्तित होत असते. गोविंद नाईक हा माणूस सडेतोड स्वभावाचा , कुणाचीही बुराई न करणारा आणि वाईटात वाईट परिस्थितीतून मार्ग काढत चेहर्‍यावर हसू ठेवणारा कलाकार आहे. त्याच्या प्रत्येक कवितेतून अथवा शेरातून त्याच्या स्वभावगुणांचे प्रतिबिंब दिसून येते. कला हे व्यक्त होण्याचे साधन आहे त्यामुळे प्रत्येकजण त्याच्या प्रकृतीनुसार आणि प्रकृतीने निवडलेल्या कलेनुसार व्यक्त होत असतो. कुणाला सामाजिक जाणिवांवर भाष्य करावे वाटते तर कुणाला निसर्गावर लिहावे वाटते. कुणाला केवळ नातेसंबंधांवर लिहावे वाटते तर कुणाला प्रणयाराधना आवडते. आपल्या प्रकृतीला वगळून काही लिहायचा प्रयत्न केलाही तरी ते लिखाण वाचकाच्या मनात खोलवर शिरू शकत नाही किंबहुना आपल्याला स्वतःलाच ते रुचत नाही.

गरज नसली तरीही चालण्याची हाव सुटते
खुळ्या नादात शहराच्या सुखाचे गाव सुटते

जिथे फिरतात चकव्यासारख्या अंधारवाटा
तिथे अफवा उजेडाची किती भरधाव सुटते

असले विचार केवळ संवेदनशील मनातूनच बाहेर येऊ शकतात. भोवतालच्या परिस्थितीचा आढावा घेऊन मोजक्या शब्दात बरेच काही सुचवण्याचा प्रयत्न केलाय. आपण फक्त आपल्या जीवनाशी या शेरांची सांगड घालून बघायला पाहिजे. आपल्या कलेचा योग्य वापर आणि अनुभवांनी शिकवलेले धडे सुत्रात टाकून समाजासमोर ठेवताना हे लिखाण काळाच्या कसोटीवर घासले जाणार आणि खरे उतरणार आहे असा त्यांना ठाम विश्वास आहे....असायलाच हवा ! कारण हे केवळ वैयक्तिक विचार नाहीत. हे विचारप्रवाह आहेत जे आपल्या आजुबाजुला वाहत असतात आणि आपल्याला जगण्याचे भान शिकवत असतात.

मुद्दा हा आहे कि वृत्तबद्ध लेखन आपल्या प्रकृतीच्या मंथनातूनच शक्य होते. बारकाईने प्रत्येक कवी/गजलकाराच्या लिखाणाकडे पाहिले तर प्रत्येकाची आपली एक खासियत आहे. तसं बघायला गेलं तर मात्रासंख्या,सुत्रे,लगावली सर्वांच्याच पाठ असतात . कवितेला/गजलेला नेमकं काय हवे हेही माहित असते. फरक असतो फक्त अंमलबाजवणीत. आपल्या मनातील विचारांना(खयाल) कशा पद्धतीने मांडल्यावर वाचकाच्या काळजाचा वेध घेता येईल याची मिमांसा जो करु शकतो तोच वृत्तबद्ध लिखाणाचा आनंद घेऊ शकतो. अनेक समिक्षणे एवढ्यात वाचायला मिळालीत ज्यात नवोदित गजलकार/कवींवर खुलेआम टिका केल्याचे आढळते. संख्यात्मक वाढ वगैरे विधाने जेव्हा केली जातात तेव्हा हा विचारही केला जावा कि विचारांची परिपक्वता प्रत्येक पिढीत सारखीच नसणार/नसेल. त्यामुळे मागच्या पिढीने पुढच्या पिढीच्या परिपक्वतेवर बोट ठेवण्यापेक्षा कालानुरुप होणारे बदल स्विकारायला हवेत.

गोविंदरावांची ही गजल माझ्या बहुतेक मुद्द्यांना स्पष्ट करणारी आहे....

मोहातुन सगळ्या वाट काढली आहे
मी तुला दिलेली वेळ पाळली आहे

जो दिवस उजाडत आहे त्यावर बोलू
कालची रात्र केव्हाच संपली आहे

मी जवळपासही माझ्या फिरकत नाही
मी मला स्वतःची भिती घातली आहे

फिरताना हल्ली त्रास उन्हाला होतो
जिकडे तिकडे सावली सांडली आहे

हे आयुष्याचे कुचकामी गाठोडे
जगण्याची आशा फक्त कोंबली आहे

ह्या तलवारीचा घाव खोलवर होइल
ह्या तलवारीची मूठ चांगली आहे

झुकतील पापण्या आता सूर्याच्याही
मी आकाशावर झेप रोखली आहे

मी मंथनात कुठल्याही सामिल नाही
मी फक्त विषावर नजर ठेवली आहे

गोविंद....

प्रकृतीला हात घालण्याचे कसब त्यांना खुप छान रितीने जमले आहे. त्यांच्या लिखाणावर चिंतन केले तर नवोदितांना लिखाणात नक्कीच योग्य मार्ग मिळेल.

मला स्वतःला पारंपारिक वृत्तबद्ध कविता लिहायला आवडते कारण मला त्यातून आनंद मिळतो. वर्तमानावर भाष्य करताना शब्दांशी सख्य करणे मला जमत नसावे कदाचित. म्हणून मी आधुनिकतेवर भाष्य करणार्‍या नवोदित कवींना कमी लेखायला नकोय. प्रत्येकाचा वेगळा पिंड असतो ज्याला आपण प्रकृति म्हणू या. महत्व हवे आकृतीबंधाला. व्याकरणाचे शस्त्र हातात घेऊन वृत्तबद्ध लेखनाची सुंदर लेणी कोरणे हेच आपले मुळ उद्दिष्ट असावे असे मला वाटते.( हे विधान वृत्तबद्ध ज्यांना वृत्तबद्ध लिखाण करायचे आहे त्यांच्यासाठी आहे ) बाकी दिवसाला हजारो कविता आपल्या मराठी साहित्याला सोडल्या जातीत. कालप्रवाहात काय काय टिकते/टिकेल याचा अंदाज आपण आतापासून घेतला तर पुढील लिखाणात सोयीस्कर पावले उचलता येतील. जाता जाता गोविंदरावांचा शेर लिहावा वाटतोय....

चक्रव्यूहाची स्वताच्या कल्पना येते कुठे
मग स्वताला भेदण्यातच संपते आयुष्य हे

चक्रव्युहात सापडण्यापुर्वीच बाहेर बाहेर पडण्याचा मार्गही शोधून ठेवा......( क्रमश:) ( चु भू दे घे )

-- संतोष वाटपाडे

कमलाकर देसले आबा - एक चिंतनशील कवी

आपण मागच्या लेखात व्यक्तिची प्रकृती आणि तिच्या रचना यांचा मेळ कसा असावा यावर प्रकाशझोत टाकला. फ़ेसबुकात अनेक वर्तुळे आहेत ज्यांचा परिघ ५००० मित्रांचा आहे. आपण नजरेत येईल तेवढे वाचतो आणि काही आवडीचे कवी असतील तर त्यांच्या भिंतीवर जाऊन त्यांच्या रचना वाचतो. असेच एक वर्तुळ आपलेही आहे, ज्यात अनेक दिग्गज साहित्यिक/कवी/लेखक/गायक,संगीतकार आणि चित्रकारही आहेत. त्यातलाच एक मित्रांना मित्र मानणारा आणि शत्रूंनाही मित्र मानणारा, मायाळूपणाच्या बाबतीत खुद्द आभाळाला लाजवणारा, मानेवर सर्रकन सुरा फ़िरवल्यागत शेर कानावर फ़िरवणारा, आपल्या वारकरी संप्रदायातून शब्दांची वारी पंढरीच्या वाटेवर रोज अव्याहतपणे नेणारा गजलकार मित्र आहे .

नाव सांगायची गरज नाहीये....कारण तुम्ही त्याला ओळखले असेलच..होय आबा !! कमलाकर आत्माराम देसले......हे नाव घेतले की वलयातल्या प्रत्येक साहित्यिकाच्या डोळ्यात आपोआप आदराचे भाव निर्माण होतात. यामागचे एकमेव कारण आहे आबांची समावेशकता. खेड्यातील रहिवास,सुसंस्कारी देसले परीवार आणि भक्तीमार्गाचा अवलंब या गोष्टींमुळे आबांच्या लिखाणाची दिशा फ़ार वेगळी आहे. आता आपण बघू या प्रकृती !

आबांशी बोलणे म्हणजे सत्संग ..मी अगदी ठाम आहे विधानावर ! आजवर आबांशी जितक्या काही चर्चा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष झाल्या आहेत त्यातुन मी घेतलेले ज्ञान म्हणजे हा लेख असे म्हणता येईल .चुकूनही कुणाचे मन न दुखावणारे आबा आपल्या लेखनातून कसे व्यक्त होताना काळ अगदी सावध असतात. एका कार्यक्रमात ते म्हणाले होते की "कागदाचे पावित्र्य आपल्या लेखनाने नष्ट व्हायला नको." आपल्या लिखाणातून प्रेरक उर्जाच मिळावी असा निशचय करुन जणू ते लिहित असावेत. नुसतेच प्रासादिक,नुसतेच मार्मिक अथवा नुसतेच सैद्धांतिक लिखाण नाही त्यांचे...गजलेत स्वतःची प्रकृती ओळखून तिच्याशी निगडीत केलेली आयुष्याविषयीची/अनुभवांविषयीची साधी भाष्ये म्हणता येतील असे शेर आहेत त्यांचे...

अंकुराला दगड सुद्धा चालतो
जीवनाला फक्त संधी पाहिजे ..
***
इस्त्री फिरली दु:खाची दिनरात अशी, की -
आयुष्याचा कपडा अवघा सुंदर झाला ...
***
ही न शर्त , की गळ्यात गोडवा हवा
आतल्या स्वरात गुणगुणायला हवे..

हा आतला स्वर म्हणजेच आपली प्रकृती... एक जाणकार कवी, उत्तम गजलकार , बुद्धिमान शिक्षक आणि फ़णसासारखा गोड स्वभाव असलेला हा कणखर गजलकार त्याच्या प्रत्येक शेरातून त्याचा वेगळेपणा सिद्ध करत असतो. कविता चांगली अथवा वाईट कधीही नसते. कविता एकतर असते किंवा नसते. आपल्या आतल्या विचारांचे आवर्तन अगदी जसेच्या तसे वाचकाच्या काळजात उतरवण्याचे कसब ज्याला जमले तोच खरा जातिवंत साहित्यिक म्हणावा...बाकी लेखण तर भरमसाठ होताना दिसतेय आपल्याला. पण डोळे जिथे थबकतात तिथे नक्कीच आपल्या अपेक्षेशी/विचारांशी सुसंगत काहीतरी असते म्हणूनच आपण ती रचना वाचतो. आबांच्या लिखाणावर जीव जडण्याचे एकमेव कारण आहे साधेपणा. हा साधेपणा त्यांच्या प्रकृतीतून आलाय यावर नक्कीच कुणाचे दुमत नसणार !

खरं तर मनातून आवेगात आलेल्या भावनांच्या महापूराला कुठल्या परिमाणाने मोजायचा नसते. मुक्तपणे व्यक्त होणं हाच कवीचा स्वभाव; मात्र कविता निर्मिती ही वेगळी प्रक्रिया आहे. वेदना- जाणिवा संवेदना त्याचसोबत आणि चिंतनाच्या मंथनातून कलाकुसर करुन विणलेले वस्त्र म्हणजे म्हणजे कविता होय. जेवढे तीव्र मंथन असणार तेवढे जास्त लोणी मिळणार . आबांच्या कविता/लेख/गजला काहीही वाचले की आपोआप "वाह्ह्ह्ह येते" ही वाहवा त्यांच्याव्यक्तित्वाशी संबंधित नसून त्यांच्या चिंतनाचा आपल्यावर होणारा परिणाम असतो ! दाखल्यासाठी हे शेर देता येतील...

कुठून येते पक्षांमध्ये तारतम्य हे ;
तुळशीवरती कधी कावळा बसला नाही ...
***
कल्पनेने तुला घामही यायचा ;
तू नितीमान होतास रे रावणा ...
***
खूप झाली अरे पुस्तके वाचुनी ;
जीवनाला जरा चाळले पाहिजे ...

प्रयोगशीलता आणि वैविध्य या दोन गोष्टीं समोर ठेवून लिखाण करत राहिल्यास वाचकाला मिळेल/ न मिळेल त्यापेक्षा जास्त आनंद आपल्या स्वतःला मिळवता येऊ शकतो. लेखकाची नजर चौफ़ेर फिरली पाहिजे जेणेकरुन त्या नजरेला निसर्गातले सर्व रस टिपता यायला हवे. कमलाकर आबांचे वाचन अफ़ाट आहे तरीही आबांनी अमुक एक कवीसारखे लिहा/लिहिले पाहिजे असे कधी म्हटले नाही कारण त्यांना स्वतःलाच एका विशिष्ट चाकोरीत लिहायला आवडत नाही.

त्यांचा दांडगा अभ्यास,छंदावर असलेला हातखंडा आणि त्यांची प्रयोगशीलता यातून निर्माण झालेली काव्यही आजन्म स्मरणात रहावीत अशी आहेत. सुंदर हस्ताक्षर,गोड गळा,संगीताची जाण, वाक:सिद्धी, लेखणीवरील संयमीत ताबा या गुणांचे मिश्रण स्मरणात रहावी म्हणून तर गेय काव्यांची निर्मिती झालीय. आजवर प्राचीन काळात लिहिले गेलेले सर्व ग्रंथ गेय स्वरुपातच तर आहेत  ! त्यावेळी गद्य लेखन / दैनंदिन व्यवहारातल्या संवादाची भाषा अस्तित्वात असेलही तरीसुद्धा गेयतेकडे विशेष लक्ष दिले गेलेय. यातून एक शिकवण आपण नक्कीच घ्यायला हवी की वृत्तबद्ध/लयबद्ध लिखाण हे चिरकाल स्मरणात राहण्यास सोपे जाते आणि मनाला आनंदही देते. आबांची ही त्यातलीच एक कविता बघा....

पाऱ्यासम हातोहाती
सुख हळूच निसटुन जाते
सावलीसारखे साथी
हे दु:ख सोबती येते

वेश्येला कसले नाते,
भोगाला घेते भोगी
आवेग संपता उरतो
मग रितेपणाचा रोगी
मग कुरुप असली तरीही
पतिव्रताच पदरी घेते ..
सावली सारखे..

लेखन आधी जन्माला आलेय आणि त्यानंतर त्याचा अभ्यास करुन त्याच्यावर आधारीत शास्त्रे निर्माण केली गेलीत. कोणताही कवी/गजलकार केवळ त्यांच्या तंत्रामुळे/वृत्तांमुळे/व्याकरणामुळे मोठा होत नसतो(मोठा मानायचा नसतो). ही तंत्रे अजरामर करणारे तुम्ही आपण असतो. अभंग छंदाला तुकारामांनी,अष्टाक्षरी छंदाला बहिणीबाईंनी अथवा दोहा छंदाला कबीरांनी अजरामर केलेय. आपली प्रतिभाच हे सर्वकाही करु शकते. म्हणून कागद पेन घेऊन कविता लिहायला बसताना हजार वेळा विचार करायला हवी की आपण काय लिहिणार आहोत? का लिहिणार आहोत? लिहायलाच हवे का? आणि लिहिलेच तर हे खरोखर असामान्य आहे का?

काही लोक यातून वेगळा अर्थ काढू शकतील ..की तंत्र शिकायलाच नको! आम्हाला नैसर्गिकरित्या,उन्मळून आलेली,प्रवाहित झालेली( वगैरे वगैरे) कविताच आवडते. पण अशा विधानांखाली दडून लिहिल्याने कुपोषित काव्ये जन्माला येऊ शकतात. माझ्या लिखाणावर वृत्तांचा संपुर्णपणे पगडा आहे हे मी मान्य करतो मात्र त्याचवेळी उत्कृष्ट मुक्तछंदांवर सुद्धा मनापासून प्रेम करतो आणि तसले मुक्तछंद मलाही लिहिता यावेत याचाही प्रयत्न करतो. मुद्दा हा आहे की तो मुक्तछंद माझ्या प्रकृतीचे प्रतिबिंब असावा. मुक्तछंदालाही एक विशिष्ट लय असते हे मी फ़क्त ऐकून आहे. ती लय नेमकी कशी ओळखावी हे मात्र मलाही माहिती नाही. त्यामुळे मला जो मुक्तछंद मनापासून आवडला तो नक्की लयीत असावा असा समज मी माझ्यापुरता करुन घेतो. मुक्तछंदात लिहिताना आबा वाचकाच्या काळजात हात घालतात...कसा ते बघा

सर्वांना दिसतात
तसेच दिसताहेत मलाही तुझे डोळे
पण सर्वांना दिसत नाहीत
ते विभ्रम पाहतो आहे मी तुझ्या डोळ्यात..
तुला माझी गझल ऐकतांना
गझल झलेली पाहतो मी

एखाद्या पट्टीच्या गायकाने
घ्याव्यात काही खास जागा
एकाच गाण्यात
तसा तुझा गाण्यासारखा चेहरा
तुझ्या साध्याच चेहऱ्यावर
उमटताहेत तशा काही जागा
फक्त जागांसाठी पुन्हा पुन्हा ऐकावे
तेच ते गाणे
तसा पाहतोय मी तुझा चेहरा
गाणे झालेला ..

तशी तू अगदीच वेगळी नाहीस
पण तू आहेसच वेगळी
भोवतीच्या गद्य चेहऱ्यात
उमटून दिसणाऱ्या
लोभस कवितेसारखी...

चांगल्या कवीला वाचकांची नस पकडता आली पाहिजे. आपल्यावर झालेल्या संस्कारांनुसार आपण शब्दांची निवड करतो. इशकृपेने तुम्ही-आम्ही अत्यंत समृद्ध भाषेच्या पोटी जन्म घेतला आहे. आपल्या भाषेत लिहिली गेलेली अनेक पुस्तके आहेत जी वाचली तरी येणार्याा हजार जन्मांचे सार्थक होऊ शकेल. मराठी भाषा भावनांच्या आवर्तनांना जसेच्या तसे मांडू शकते. आपली भाषा आपल्याला  आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करायची संधी देते. आबांची वृत्तबद्ध कविता वाचताना मनाचे संपुर्ण समाधान होते कारण त्यांची शब्दांची निवड आपल्या तृष्णेच्या जवळपास असते. ही कविता बघा..

सूर्याचा गोंदून जाळ , अंग आभाळ
तापतो माळ , उभ्या देहाचा
ये शामल संध्याकाळ , बांधुनी चाळ
वाजवित टाळ, तमाची वाचा

नावाला दोघे दोन, एकची प्राण
कुणाचे कोण , निरर्थक चर्चा
प्रेमाचे एकच गान, विलंबित तान
श्रुतीचा कान, सूर हा वरचा

असाधारण चिंतनातून आलेला एकेक शब्द काळजाला स्पर्श करतो. याचसाठी आपण आपल्या प्रकृतिला ओळखून त्यानंतर विषय निवडावेत आणि लिखाण करावे . आपल्या मित्रयादीत अमुक एकजण लिहितोय आणि प्रसिद्धी मिळवतोय म्हणून आपणही आता लिहिले पाहिजे या अट्टहासाने नैराश्य पदरी पडते. आपण कवितेकडे धावत जाण्यापेक्षा तिला आपल्याकडे येऊ द्यावे. स्पर्धा करत राहिलो तर थकवा येईल आणि आत्मानंदापासून आपण हळूहळू दूर जाऊ.

--- संतोष वाटपाडे